योजना

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Namo Shetkari Mahasanman Fund Scheme

किसानवाणी | केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ (Namo Shetkari Mahasanman Fund Scheme) राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केली.

केंद्र सरकारच्या PM Kisan योजनेच्या धर्तीवर आखण्यात आलेली ही योजना नेमकी काय आहे? या योजनेसंदर्भातील काही महत्वाच्या बाबींविषयी आपण जाणून घेणार आहोत…

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ नेमकी काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखालील केंद्र सरकार देशभरात ‘पीएम किसान सन्मान निधी योजना’ राबवत आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. वर्षात दर 4 महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.

केंद्र सरकारच्या याच योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार आणखी 6 हजार रुपयांची भर घालणार असून, यामुळे राज्यात पीएम किसान योजनेच्या लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळणार आहेत.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कधीपासून व कशी लागू होणार?

केंद्र सरकार दरवर्षी तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात PM Kisan योजनेचा निधी वर्ग करते. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी जारी करण्यात आला. तर या योजनेचा पुढील हप्ता एप्रिल ते जुलै 2023 दरम्यान जारी केला जाईल. त्यामुळे केंद्राच्या पुढील हप्त्यातच राज्य सरकार त्यांच्या वाट्याची रक्कम टाकून शेतकऱ्यांना देणार, की वेगळी काही कार्यपद्धती अवलंबणार, हे मात्र या योजनेचा (Namo Shetkari Mahasanman Fund Scheme) शासन निर्णय आल्यावरच स्पष्ट होणार आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ किती शेतकऱ्यांना लाभ देणार?

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा लाभ सुमारे 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबाना होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारने सुरवातीच्या काळात पीएम किसान योजनेत केलेल्या चुका दुरूस्त करत बोगस लाभ घेणाऱ्यांना आळा घालण्याचे काम केले होते. त्यामुळे देशपातळीचा विचार करता गेल्या काही दिवसांपासून PM Kisan योजनेतील लाभार्थ्यांची संख्या खालावली असून, ती 11 कोटीवरून साडे आठ कोटींवर आली आहे. त्यामुळे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची (Namo Shetkari Mahasanman Fund Scheme) प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल ते स्पष्ट होणार आहे.

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्यांनी काय करायला हवं?

पीएम किसान सन्मान निधीचे पैसे ज्या बँक खात्यावर जमा होतात, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे. परंतु राज्यातील तब्बल 12 लाख शेतकऱ्यांचे बँक खाते अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाहीये. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी तात्काळ त्यांचे बँक खाते (ज्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येतात) आधार नंबर आणि फोन नंबरशी लिंक करून घ्यावे.

पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जारी होण्याच्या आधीच शेतकऱ्यांनी हे काम केल्यास त्यांना दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ मिळण्याची जास्त शक्यता आहे.

Back to top button