बातम्याशेती तंत्रज्ञान

नॅनो डीएपी खत म्हणजे काय? त्याचा कृषी क्षेत्रात कसा फायदा होणार? NANO DAP Fertilizer

किसानवाणी | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (१ फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सर्व कृषी हवामान विभागांमधील विविध पिकांवर नॅनो डीएपी (NANO DAP Fertilizer) वापर करण्याची घोषणा केली. “नॅनो युरियाचा यशस्वी अवलंब केल्यानंतर, विविध पिकांवर नॅनो डीएपीचा वापर सर्व कृषी-हवामान झोनमध्ये विस्तारित केला जाईल,” असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

डीएपी आणि नॅनो डीएपी खतातील फरक काय? NANO DAP Fertilizer

डीएपी किंवा डाय-अमोनियम फॉस्फेट हे युरियानंतर भारतात सर्वांत जास्त वापरले जाणारे दुसरे खत आहे. त्यात फॉस्फरस (पी) जास्त आहे. झाडे त्यांच्या सामान्य आकारात वाढू शकत नाहीत किंवा परिपक्व होण्यास खूप वेळ घेतात, तेव्हा मुळांच्या स्थापना आणि त्याच्या विकासाला हे खत उत्तेजन देते. अशा प्रकारे पेरणीच्या अगदी आधी किंवा पेरणीच्या वेळी हे खत टाकले जाते.

गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या एप्रिलमध्ये इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह (आयएफएफसीओ)चे नॅनो डीएपी खत लाँच केले. त्यामध्ये व्हॉल्युमनुसार ८% नायट्रोजन आणि १६% फॉस्फरस आहे. पारंपरिक डीएपी खत दाणेदार स्वरूपात येते; तर आयएफएफसीओचे नॅनो डीएपी खत द्रव स्वरूपात येते.

आयएफएफसीओची वेबसाईट सांगते की, नॅनो डीएपी खताचा पृष्ठभागाच्या क्षेत्रफळ ते आकारमानाच्या दृष्टीने फायदा होतो. कारण- त्याच्या कणाचा आकार १०० नॅनोमीटरपेक्षा कमी आहे.

या लहान कणाचा आकार नॅनो डीएपीला त्याच्या पारंपरिक भागापेक्षा अधिक कार्यक्षम बनवतो; ज्यामुळे खत बियांच्या/पृष्ठभागाच्या आत, पानांच्या रंध्रांतून किंवा वनस्पतींच्या इतर छिद्रांतून सहज प्रवेश करू शकते. वनस्पती प्रणालीमध्ये खत व्यवस्थितरीत्या शिरल्याने बियाणे अधिक जोम, चांगल्या गुणवत्तेमुळे पीक उत्पादनात वाढ होते. या खताच्या वापराने पर्यावरणाला हानी न पोहोचवता पिकांच्या पोषणाची गरज पूर्ण होते.

नॅनो डीएपी खताचे इतर फायदे

नॅनो डीएपी पारंपरिक डीएपीपेक्षा खिशाला परवडणारे आहे. नॅनो डीएपीची ५०० मिली बाटली पारंपरिक डीएपीच्या ५० किलो बॅगेच्या समतुल्य फक्त ६०० रुपये आहे (बॅग १३५० रुपये). सरकार डीएपीवर लक्षणीय अनुदान देत ​​असल्याने, अधिक स्वस्त खताचा अवलंब केल्याने सरकारला अनुदानासाठी करावा लागणारा खर्च कमी होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी नॅनो डीएपीचा वापर अधिक सोईचा आहे. कारण ५० किलोच्या पिशव्यांपेक्षा ५०० मिलीच्या बाटल्यांची वाहतूक करणे, त्यांची साठवणूक करणे आणि त्यांचा वापर करणे अगदी सोपे आहे. २५० ते ५०० मिली डीएपी पाण्यात विरघळवून प्रतिएकर फवारणीसाठी आवश्यक असलेले खत पिकांवर फवारले जाते.

खतांच्या आयातीवरील खर्च कमी होण्यास मदत होणार आहे, कास भारत सध्या देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खते आयात करतो. देशांतर्गत उत्पादित होणारे नॅनो डीएपी खत स्वीकारल्याने डीएपीच्या आयातीचा भार कमी होणार आहे.

Back to top button