कोकणात मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी | Maharashtra Monsoon 2026

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

राज्यात मॉन्सूनची पुन्हा गती वाढू लागल्याने अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्यास (Maharashtra Monsoon 2026) सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, २३ जून २०२६ रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्ण हवामान आणि वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. राज्यातील इतर भागांमध्येही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल संथ झाली होती. मात्र आता अरबी समुद्रावरून मॉन्सूनची आगेकूच पुन्हा सुरू झाल्याने राज्यातील हवामानात बदल दिसून येत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अनेक भागांमध्ये पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यातील वसई आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथे सुमारे ५० मिमी पाऊस झाला. रत्नागिरी, गुहागर आणि महाड येथे ४० मिमी, तर कणकवली येथे ३० मिमी पावसाची नोंद झाली. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) परिसरात ८० मिमी पाऊस झाला असून पुणे शहरात सुमारे २० मिमी पावसाची नोंद झाली.

आज विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्ण हवामानासोबत वादळी पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांना उष्ण हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही उष्णतेचा प्रभाव कायम आहे. सोमवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला आणि गोंदिया येथे ४१.४ अंश, तर अमरावती, भंडारा आणि वर्धा येथे ४१ अंश तापमान नोंदविण्यात आले. धुळे, जळगाव, मालेगाव, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ येथेही ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी १८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

प्रमुख जिल्ह्यांसाठी हवामान इशारे : Maharashtra Monsoon 2026

इशाराजिल्हे
ऑरेंज अलर्टवर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर
येलो अलर्ट (उष्ण हवामान)यवतमाळ, गडचिरोली
येलो अलर्ट (जोरदार पाऊस)मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा
येलो अलर्ट (वादळी पाऊस)पालघर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा

दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची अर्थात मॉन्सूनची दोन आठवड्यांपासून अडखळलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. २२ जून रोजी मॉन्सूनने कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील पुणे तसेच मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूरपर्यंत प्रगती केली. यापूर्वी ८ जून रोजी मॉन्सून रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे आणि सोलापूरपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर जवळपास १५ दिवस त्याची प्रगती मंदावली होती.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत मॉन्सून मुंबईसह महाराष्ट्रातील आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण तेलंगणा, ओडिशा आणि छत्तीसगड, झारखंड व बिहारच्या आणखी काही भागांतही मॉन्सून दाखल होण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. कोकणात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे असून, राज्यातील शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा