किसानवाणी | पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Yojana) प्रत्येक घरगुती ग्राहकासाठी लाभदायक असून, राष्ट्रीय बँका अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. राज्यातील सर्वच ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी केले.
कोल्हापूर परिमंडळ कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर आणि कोल्हापूर मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे उपस्थित होते.
नीता केळकर यांनी कोल्हापूर येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’, पंतप्रधान मोफत सूर्यघर योजना आणि अन्य प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेतला. ग्राहक संघटना आणि उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाला त्यावर त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या.
त्या म्हणाल्या, “शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर प्रकल्पांना गती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १७० मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे काम सुरू आहे. मागेल त्या शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदानात सौरपंप मिळत आहेत. तसेच घरगुती ग्राहकांसाठी पंतप्रधान मोफत सूर्यघर योजनेत ३० हजारांपासून ७८ हजारांपर्यंत अनुदान मिळते.”
स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये गैरसमज असून, हे अद्ययावत तंत्रज्ञान भविष्यात अधिक फायदेशीर ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.